भाजपने गेल्या वेळेप्रमाणे यावेळी देखील प्रथम सत्तास्थापन करण्याचे निश्चित केले आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 5 नोव्हेंबरला सायंकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केले आहे. वानखेडे स्टेडियम येथे हा समारंभ होणार असून आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्यावर समारंभ आयोजित करण्याची जबाबदारी सोपविली आहे. समारंभाची जय्यत तयारीही सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे.

जनतेने सत्ता स्थापन करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल दिला आहे. भाजप यामध्ये सर्वाधिक जागांवर विजय मिळवून मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेची मात्र सत्ता स्थापनेसाठी ‘बार्गेनिंग पावर’ वाढली असल्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या भूमिकेवर शिवसेनासुद्धा अडून बसली आहे. शिवसेना-भाजपमध्ये अद्यापही मुख्यमंत्री पदावरून ‘आमचाच मुख्यमंत्री’ अशी भूमिका आहे.

येत्या 9 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. सरकार तत्पूर्वी गठित करणे महत्वाचे असल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी करण्याचा बी प्लॅन भाजपने आखला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने भाजपने 2014 मध्ये प्रथम सत्ता स्थापन करून नंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. त्याच पद्धतीने पुढे जाण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार असून त्यांच्यासोबत भाजपचे अन्य काही मोजक्या नेत्यांनाही मंत्री पदाची शपथ देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शपथविधी समारंभ मंगळवारी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेदरम्यान पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शपथविधीनंतर विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार असून वडाळ्याचे सर्वात ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमले जाणार आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: