भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे म्हणत शिवसेनेला सूचक इशारा दिला. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे. आता त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेवर भाजप दबाव आणत असल्याची चर्चा आहे. चर्चेला दिवाळीमुळे उशीर झाला असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्याचबरोबर चर्चेला येत्या एक-दोन दिवसात सुरुवात होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रातील ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. लोकांनी यंदाच्या विधानसभेत महायुतीच्या बाजूने कल दिला होता. निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी शपथविधीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. मंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरले जात आहे. परिणामी नवे सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे.

नवीन राजकीय समीकरणे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जुळून येण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या उमेदवाराला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेसह इतर पक्ष विरोध करण्याची शक्यता आहे.

शिवसेनेशिवाय सरकार स्थापन केल्यास नवीन सभागृहात हंगामी अध्यक्ष आधी सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील आणि त्यानंतर नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. भाजपच्या उमेदवाराला अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत शिवसेनेसह इतर पक्ष विरोध करू शकतात. या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यास शिवसेना आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असल्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत होऊन भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: