पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना यांच्यात दरी निर्माण करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सत्य मोदींपासून लपवून का ठेवले? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. बंद दाराआड झालेली चर्चा शहांनी मोदींपर्यंत पोहोचवलीच नाही.
 
तसेच ज्या खोलीत ही चर्चा झाली ती खोली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खोली आहे. ती आम्हाला मंदिरासमान असल्याचेही राऊत म्हणाले.अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाच्या वाटपासंदर्भात केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे नाते हे भावाचे आहे.
त्यात कोणीतरी जाणीवपूर्वक काडी घालत असल्याचे वक्तव्य केले होते. आता संजय राऊत यांनीदेखील त्याचाच पुनरुच्चार केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेत कोणीतरी दरी निर्माण करत असल्याचा आरोप करताना संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांच्या खोलीत बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यादरम्यान जी चर्चा झाली ती पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवण्यातच आली नाही. ही चर्चा काय होती, हे आता अमित शहा यांनी उघड करावे. ही खोली बाळासाहेब वापरत असत. 
या खोलीत बसूनच बाळासाहेबांनी अटलजी, अडवाणी यांच्यापासून अनेकांना आशीर्वाद दिले आहेत. ही खोली साधीसुधी नाही. ती आमच्यासाठी मंदिरच आहे. तिथे झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेब आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. आम्ही व्यापारी नाही, राजकारण हा आमचा धंदा नाही. कोणी धमक्या देत असेल तर त्यांना आम्ही भीक घालत नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: