मुंबई : आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडसाठी हजारो वृक्ष एका रात्रीत कापण्यात आले होते. प्रशासनाने एका रात्रीत हे कृत्य केल्यानंतर अनेक पर्यावरणप्रेमींकडून आंदोलन करण्यात आले. आरेमध्ये मानवी साखळी बनवून निषेधही व्यक्त करण्यात आला.

 

मात्र यावेळी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या वृक्षप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आरेतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भीमा कोरेगाव आंदोलनातील खोटे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे.

 

शनिवारी आणि रविवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन झाले. यावेळी सभागृहात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरेमधील आंदोलनादरम्यान अनेक तरुण मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पालकांना याची चिंता आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी आव्हाडांनी केली. या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी संध्याकाळी गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. यासोबतच आरेचे आंदोलन करणारे सुटले आहेत. आता भीमा कोरेगावमधील आंदोलनावेळी मागील सरकारने जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते मागे घेण्यात यावेत अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. यासोबतच नितेश राणेंनी नाणार प्रकल्पाचा विरोध करणाऱ्यांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.                                                                                

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: