मुंबई : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहेत. मात्र आता स्वत: पंकजा मुंडेंनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी खूप व्यथित आहे, माझ्या पोस्टचा विपर्यास केला गेला. मी माझ्या पक्षाशी बांधिल असून, भाजप पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं. बंडखोरी माझ्या रक्तात नाही. पक्षावर दबाव टाकण्यासाठी मी हे करत आहे, असा आरोप होत आहे. मात्र हे देखील सत्य नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

 

पंकजा मुंडे यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. पंकजा यांना जेवणाचंही निमंत्रण देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यांची माहिती आहे. पंकजा मुंडे पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास त्यांना भेटून येणाऱ्या भाजप नेत्यांना आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागला असल्याची माहिती, सूत्रांकडून मिळत आहे.

 

भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारी पोस्टी पंकजा मुंडे यांनी केली आहे. यामध्ये भाजपचे कमळाचे चिन्ह दिसत आहे. याआधी पंकजा मुंडेंच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असं होतं. पण आता ट्वीटरवर पेजवर फक्त पंकजा मुंडे असं लिहलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची सध्या चर्चा आहे. खरंतर, पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. यातच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: