शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते सत्तास्थापनेसाठी एकत्रित प्रयत्न करत असताना भाजपनेही गुरुवारी रात्री आपल्या पक्षाच्या आमदारांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक झाली. भाजपच्या १०५ आमदारांसोबतच, भाजपला समर्थन देणाऱ्या पक्षाचे तसेच अपक्ष आमदारही या बैठकीला उपस्थित होते.

‘राज्यात तीन पक्षांचे सरकार येऊच शकत नाही, आले तरी सहा महिन्यांच्या वर टिकणार नाही. त्यामुळे राज्यात केवळ भाजपचेच किंवा भाजपच्या सहकार्यानेच सरकार स्थापन होऊ शकते, अशी राजकीय स्थिती आहे. त्याचा निर्णय योग्य वेळी पक्ष घेईल. त्यामुळे पक्षाच्या आमदारांनी मुंबईत थांबण्याची गरज नाही.

त्यांनी जनतेत जावे, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, त्यांना दिलासा देऊन मदत करा. शेतकऱ्यांना भक्कम मदत मिळेल, हे सुनिश्चित करा. सत्तेसाठी भाजप काम करीत नाही, तर जनतेसाठी काम करणे, हे आपले पहिले लक्ष्य आहे,’ असे आवाहन फडणवीस यांनी केले.

तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या हितासाठी एकसूत्री कार्यक्रम राबवणार आहेत. ५ वर्ष नाही तर २५ शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांना देखील टोला लगावला.

महाराष्ट्राला शिवसेनाच नेतृत्व देणार आहे. आमच्या फॉर्मुलाची कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही. ते उद्धव ठाकरे ठरवतील. ५ वर्ष नाही तर पुढील २५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा अशी आमची इच्छा आहे. मात्र मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन मी असे म्हणणार नसल्याचे सांगत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: