मुंबई : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला हरकत नव्हती असे विधान भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात नुकतीच महत्वाची चर्चा झाली. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्या. पंकजा आणि माझ्या मुलीचा झालेल्या पराभवाबाबत आम्ही चर्चा केल्याचे खडसेंनी पत्रकारांना सांगितले.

 

इथं पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे. त्यांची नावे मी चंद्रकांत दादांकडे दिली असल्याची माहीती त्यांनी दिली. विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे हे बहुजन नेते आहेत. यांना जाणिवपूर्वक डावलण्यात आले. यांना जर विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली असती तर १०५ पेक्षा अधिक लोक निवडून आले असते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

 

पराभवाची जबाबदारी देखील नेतृत्वाने घेतली पाहीजे असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता टोला लगावला. यश माझ्यामुळे अपयश दुसऱ्यामुळे हे धोरण पटत नाही. ही जबाबदारी पक्षावर ढकलणे योग्य नाही. ही वैयक्तिक जबाबदारी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. जनतेने महायुतीला मतदान केले होते. समन्वय साधत भाजप दोन पाऊले गेली असती तर सरकार आले असते. शिवसेनेची मागणी मान्य करायला हरकत नव्हती असेही खडसे यावेळी म्हणाले. 

 

मी ही गोष्ट स्वत: वरिष्ठांच्या कानावर घातली. मला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. गेल्या काही काळात जे काही घडले त्यामुळे पक्षातील अनेकजण अस्वस्थ आहेत. याबद्दल मी वरिष्ठांना कळवल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी भाजपमध्ये ओबीसी नेतृत्त्वाला डावलले जात आहे का, असा प्रश्नही खडसे यांना विचारला. त्यावर खडसे यांनी म्हटले की, दुर्दैवाने हे चित्र खरे वाटत आहे. हे पटवून देताना खडसे यांनी प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि संचेती या नेत्यांचा उल्लेख केला.

 

तसेच अपयशाबद्दल माझा रोख हा माजी मुख्यमंत्र्यांवर नव्हे तर नेतृत्त्वावर आहे. तुम्ही यशाची जबाबदारी घेता तसे अपयशही स्वीकारले पाहिजे. पराभव झाल्यानंतर त्याची जबाबदारी पक्षावर ढकलणे योग्य नाही. वैयक्तिकरित्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली गेली पाहिजे, असे सांगत खडसे यांनी फडणवीसांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसेच पक्षातील नाराजांची मोट बांधावी लागत नाही, ते आपोआप एकत्र येतात, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: