नो बॉलविषयी एक नवा नियम आयसीसीने तयार केला असून त्यानुसार आता नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांवर असणार आहे. कोणत्याही प्रकारची चूक नो बॉल देताना होऊ नये, यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. हा नियम २१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आयसीसीने लागू केला आहे.

 

याआधी नो-बॉलच्या निर्णयासंदर्भातील प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर वापर आयसीसीने भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेत केला होता. त्यानंतर आता आयसीसीच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.

 

आता मैदानातील पंच आयसीसीच्या नव्या नियमानुसार नो बॉल देणार नाहीत. तिसऱ्या पंचावर याची जबाबदारी असणार आहे. तिसरे पंच टीव्हीवर पाहून नो बॉल असल्याचे मैदानातील पंचांना कळवतील. त्यानंतर मैदानातील पंच त्या चेंडूला नो बॉल ठरवतील. दरम्यान मागील काही काळात नो बॉलवरुन पंच, कर्णधार आणि खेळाडूंमध्ये वादविवाद पाहायला मिळाले आहेत. यामुळे आयसीसीने हा नवा नियम बनवला आहे.

 

आयसीसीकडून याविषयी सांगण्यात आले की, नो बॉल विषयीच्या नव्या प्रणालीचा १२ सामन्यात वापर करण्यात आला. यात तिसऱ्या पंचांनी टीव्हीवर ४७१७ चेंडू तपासले. तेव्हा त्यात त्यांना १३ चेंडू नो बॉल असल्याचे दिसून आले. अचूक निर्णयासाठी या प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: